Monday, March 15, 2010

आमचे स्वयंपाकाचे प्रयोग !!! :(

आजकल आम्ही रूमवर स्वयंपाक करतो .पण खुपच मोजकी भांडी आहेत म्हणजे १ पातेले ,२ प्लेट आणि इलेक्ट्रिक शेगडी .त्यांचा वापर करून फक्त चहा भात आणि भाजी बनवता येते .परंतू भाजी खायची कशाबरोबर .कारण पोळ्या बनवण्यासाठी पोळपाट लाटण नाहीये .दोन अडीच महिन्यांसाठी नवीन विकत घेण्याचा विचार पण सोडून दिला .पण पोळ्या बनवण्याची सुप्त इच्छा तशीच दडून बसलेली होती .२-३ दिवसांपूर्वी अलका रूमवर आली आणि तिने आम्हाला काही दिवसांसाठी इलेक्ट्रिक चपातीमेकर दिला .आणि चपाती कशी बनवायची तेपण सांगितलं. चपातीमेकरच खूप नवल पण वाटत होतं .कारण नुसता गोळा ठेवला तरी पोळी तयार .किती छान !! फक्त कणिक भिजून घ्यायचं पोळी लाटायला पण लागत नाही .।
आम्ही काय खुश झालो म्हणून सांगू .पोळ्या करण्यासाठी काहीही नसल्यामुळे इतक्या दिवस गव्हाचं पीठ आणलं नव्हत .तर त्यादिवशी दिवसभर चपात्या आणि नंतर पराठे (मेथीचे तरी ) बनवण्याचा बेत करत होतो .लगेच दुसर्या दिवशी दुकानातून गव्हाचं पीठ घेऊन आलो .आणि उत्सहाने पोळ्या बनवायला घेतल्या .चपाती मेकर कसा वापरायचा ते अलकाने सांगितल होतच.तरी पण जरा शंका आणि उत्सुकता होतीच की चपात्या कशा बनतील त्याची .त्यामुळे सुरुवातीला अगदी छोटा उंडा म्हणजे औषधाच्या गोळी एवढा घेतला आणि चपाती बनवून पाहिली .पहिल्याच वेळेस अपेक्षा भंग झाला.कारण ती छोटी चपाती खूप कडक झाली होती .कच्ची वैगरे राहिली की काय म्हणून टेस्ट करायला गेलो तर ती चपाती खाकाऱ्या सारखीच लागली .
पण विचार केला की ठीक आहे अगदी कमी पीठ असल्यामुळे कदाचित इतकी कडक चपाती बनली असावी . त्याच्यापेक्षा थोडा मोठा उंडा घेतला तरी पण तेच.तीपण चपाती खाऊन संपवली .पण असे खाकरे टाइप चपात्या कसा खायच्या भाजीबरोबर .तरी पण मेघना म्हंटली ठीक आहे चालतील आपल्याला अशापण कडक पोळ्या ,तर शेवटी पूर्ण चपातीमेकर भरून चपाती होईल एवढा गोळा घेऊन बनवायला सुरुवात केली .सुरुवातीला तो गोळा चपातीमेकरच्या बाहेर यायचा पुन्हा तो आत ठेवायला लागायचा .आणि नंतर २-३ वेळा असं झालं की कुठे चपातीसारखा आकार बनायचा.चपाती बनवत असताना बाजूने वाफ बाहेर पडायची ती इतका भयंकर आवाज म्हणजे कुकरची शिट्टी आणि मिक्सर चा आवाज याचं मिश्रण च होतं.ते पण रात्री साडेअकरा वाजता आम्ही चपात्या बनवत होतो .काय विचार करत असतील आमचे शेजारी माहित नाही . हे झालं आकाराबद्दल पण शेवटी चपाती म्हणून जो final product बाहेर पडत होता तो खूपच दिव्य होता .
अशाप्रकारे नेहमीच्या जेवढ्या पिठामध्ये चार पोळ्या बनतात तेवढ्याच पिठाच्या लहान लहान सहा पोळ्या बनवून घेतल्या.आणि खरी गम्मत तर आता पुढे जेवतांना होती .जो पदार्थ आम्ही चपाती म्हणून खात होतो तो धड चपाती तर सोडाच पण खाकरा पण बनला नव्हता .लहान असतांना जी पहिली पोळी बनवली होती तीसुद्धा यापेक्षा शतपटीने चांगली झाली होती .





जेवणासाठी जेवढा जास्तीत जास्त वेळ बसू शकतो तेवढ्या वेळेत दोघींची मिळून एकसुद्धा चपाती संपली नव्हती .दोन तीन दिवसांच्या शिळ्या पोळ्या सुद्धा त्यापेक्षा चांगल्या लागल्या असत्या कमीतकमी सहज खाऊ तरी शकलो असतो .नेहमी चपातीबरोबर मेथीची भाजी खातो आज मेथीच्या भाजीबरोबर चपाती असंसुद्धा नाही नुसतीच भाजी खात होतो , भुकेल्याला भाजीचा आधार असी आमची गत झाली होती...