Friday, June 25, 2010

हॉर्ससिक...


आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आणि घोड्यावर बसायला खूप आवडतं. आणि खरच की बोटिंगनंतर लगेच ते हॉर्स रायडिंग साठी गेले.आणि सुरेश सरांनी मला आणि मेघनाला विचारलं"तुम्हाला पण बसायचय का घोड्यावर?". आम्ही दोघीही नाही म्हणालो, मला माहीत नाही मेघना का नाही म्हणाली ते,परंतु मला तर बिलकूल आवडत नव्ह्तं.आवडत नाही असं नाही पण खुप आवडतं असही नाही. आमच्या गावात दरवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी पालखी येते, आणि त्या पालखीतला तो पांढरा शुभ्र घोडा त्या रात्री आमच्या घरीच बांधतात परंतु मला कधीच त्यावर बसण्याची इच्छा झाली नाही. पण त्यादिवशी हॉर्स रायडिंगसाठी असलेली गर्दी पाहून कधी नव्हे पण थोड्यावेळासाठी का होईना पण मलाही घोड्यावर बसण्याची इच्छा झाली. तेव्हापासून घोडाच काय पण खेचर आणि गाढवं पण आवडायला लागलीत. आणि ते बालपणीचे दिवस आठवायला लागले. अशीच इच्छा मी १०-१२ वर्षांची असताना झाली असती तर किती बर झालं असतं.वराती मागून घोडे म्हणण्यापेक्षा घोड्यानंतर इच्छा, अशी इच्छा काय उपयोगाची?
माझ्या जन्माच्या अगोदर पासून आमच्याकडे एक घोडा होता. घोडा नाही- मैनी नावाची घोडी होती. खूप छान होती तपकिरी रंगाची अगदी दणकट. पणजोबा ,भाऊ(आजोबा) आणि बापू(वडिल) कुठे गावाला जायचं असेल किंवा वाळकीला बाजार असेल तर तिच्यावर बसून जायचे.आमच्याकडे टांगापण होता त्यावेळेस आणि मोडलेल्या स्थितीत अजूनपण आहे.वडिल लहान म्हणजे ९-१० वर्षाचे असताना आत्याच्या गावावरून (३०-४०कि.मी) घोडीवर बसून एकटे आलेले ,माझ्या वडलांना रस्ता माहीत नव्हता परंतु मैनीला माहीत होता,त्यामुळे ते व्यवस्थित घरी पोहोचले.आणखी एक गोष्ट वडिल सांगतात ती म्हणजे, माझा चुलता आणि आत्या त्यांच्या लहानपणी गुरांमागे जायचे,एके दिवशी चुलत्यांनी घरी आजोबांना घोडीच्या शेपटीचे केस कापून आकार देतांना पाहिलं असावं,लहान मुलानां कोण हात लावून देतं अशा कामाला? मग त्याच दिवशी गुरांमागे ते कात्री घेऊन गेले आणि घोडीचे केस कापण्याची हौस आत्याचे लांबलचक केस कापून पूर्ण केली. थोडेथिडके केस नव्हते कापले, पूर्ण टक्कलच केल होतं. त्याचा अजुनही आत्याच्या केसांवर प्रभाव आहे. आणि त्यानंतर नानाला जी काही बोलणी बसली ती पाहून नंतर असे प्रयोग कोणीच कोणावर केले नाही.
जेव्हा आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ वेगळं निघाले तेव्हा वाटणीमध्ये मैनी म्हणजे घोडी आमच्याकडे आली. तेव्हा मला जस कळतय तसं तिला काहीही खास काम करावं लागायच असं मला नाही आठवत. हो परंतु एक गोष्ट कशी विसरेल. जेंव्हा लहान असतानां आईबरोबर शेतात जायचे,जातानां नेहमी आई बरोबर जायचे ,परंतु घरी येताना माझा नंबर लागायचा तो म्हणजे आजोबां बरोबर .एकतर ते आणि मी घोडीवर बसून जायचो, नाहीतर ते मला त्यांच्या खांद्यावर बसवुन घरी घेऊन जायचे. मला घोड्यावर बसण्यापेक्षा खांद्यावर बसायलाच जास्त आवडायचं.कारण की घोडीची कडक पाठ मला बिलकुल आवडायची नाही आणि खूप उंच असल्यामुळे पडायची भीती पण वाटायची.
आणि दुसरीकडे आजोबांचा खांद्यावर काय भारी वाटायचं! नंतर नंतर म्हणजे ३ री-४ थीत असताना आणखी एका गोष्टीची भर म्हणजे एकदा माझ्या १-२ मैत्रिणिंनी मला घोडीवरुन घरी येतानां पाहिलेल आणि हसल्यासुद्धा तेव्हापासून मी घोडिवर बसायचच सोडून दिलं. घोडी आणि बैलगाडी असे दोन पर्याय असतील तर मी बैलगाडीकडेच पळायचे.
अशाप्रकारे मैनीचं कौतुक होण्यापेक्षा तक्रारीच जास्त होत्या . आम्ही तिला बाकीच्या गुरांबरोबर चारायला घेऊन नाही जायचो. त्यामागच कारण मला नाही माहीत ,कदाचित बाकीच्या गुरांच्या तुलनेत तिची चालण्याची आणि खाण्याची सवय वेगळी असेल. रोज सकाळी-सकाळी ७-८ वाजता तिला एकटीला पायखुटी घालून चरायला पाठवायचो. आणि बाकीच्या कामांबरोबर मला आणखी एक काम असायचे ते म्हणजे रोज शाळेतून आलं की मैनीला शोधून आणून बांधा. बर्‍याच वेळी कुणाच्या शेतात पीक खाण्यावरुन तक्रारीपण यायच्या. पण असं खूप कमी वेळा झालेलं. खरतर तिला गुरांबरोबर नेण्यास काही हरकत नव्हती. जर उंटावरुन शेळ्या हाकणं शक्य असेल तर घोडी वरुन गायी ,वासरं आणि शेळ्या हाकणं नक्कीच जमलं असतं.पण हे खूप आधी सुचायला हवं होतं. आता काय ’बोलाचाच भात आणि बोलाचिच कढी’.
तिला एकदा पिल्लू (घोडा) झालं ,खुप सुंदर होतं.तेव्हा १५-२० दिवसांसाठी तिला घरीच चारा घालायचो. त्यावेळी आमच्या शेजारची मुलं येऊन तिच्यावर बसायची. ते तिचं शेवटच पिल्लू होतं.त्यानंतर तिला कधीच पिल्लू झालं नाही. खुप वृद्ध झाल्याने ती गेली. कदाचित ते शेवटचं पिल्लू पाळण्याचा घरचे विचार करायचे परंतु पैशाच्या अडचणीमुळे आम्ही त्याला १ वर्षाच्या आतच विकलं. आता असं वाटत की नसतं विकलं त्यावेळी तर किती बरं झालं असतं,किती मोठा घोडा असता आज आमच्याकडे. परंतु ते पिल्लू घरी ठेऊन घेतले असते तर त्याला सांभाळायचा प्रश्न आलाच असता, न जाणे कदाचित मलाच शाळा सोडून त्याला घेऊन गुरांमागे जावं लागलं असतं. आणि आपल्या नातवांना शाळा सोडावी लागू नये म्हणून पण कदाचित त्याला घरी ठेवण्याचा विचार आजोबांनी सोडून दिला असावा. नाहीतर नंतर छोटं घोड्याच पिल्लू घेणं हे काय येवढं अवघड नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे आजोबांनी आमच्या नातेवाईकानां ९-१० तरी घोडे घेऊन दिले असतील.
असो तर, माझी घोड्यावर बसण्यापेक्षा पण घोडा घेण्याची तीव्र इच्छा आहे आणि घोडा घेणं एवढ पण अवघड नाही. अगदीच काय जगातले सगळे घोडे नष्ट नाही झाले. मला माहीत आहे कुठे मिळतील ते. धनगर आणि घिसड्यांकडे सहजासहजी मिळतील. एकदा प्रयत्न करते आजोबांना सांगण्याचा बघुया काय म्हणतायेत ते. आजोबांनी ऎकलं तर मजाच येईल ,रोज रोज हॉर्स रायडिंग करायला मिळेल !!!!!!!

Monday, March 15, 2010

आमचे स्वयंपाकाचे प्रयोग !!! :(

आजकल आम्ही रूमवर स्वयंपाक करतो .पण खुपच मोजकी भांडी आहेत म्हणजे १ पातेले ,२ प्लेट आणि इलेक्ट्रिक शेगडी .त्यांचा वापर करून फक्त चहा भात आणि भाजी बनवता येते .परंतू भाजी खायची कशाबरोबर .कारण पोळ्या बनवण्यासाठी पोळपाट लाटण नाहीये .दोन अडीच महिन्यांसाठी नवीन विकत घेण्याचा विचार पण सोडून दिला .पण पोळ्या बनवण्याची सुप्त इच्छा तशीच दडून बसलेली होती .२-३ दिवसांपूर्वी अलका रूमवर आली आणि तिने आम्हाला काही दिवसांसाठी इलेक्ट्रिक चपातीमेकर दिला .आणि चपाती कशी बनवायची तेपण सांगितलं. चपातीमेकरच खूप नवल पण वाटत होतं .कारण नुसता गोळा ठेवला तरी पोळी तयार .किती छान !! फक्त कणिक भिजून घ्यायचं पोळी लाटायला पण लागत नाही .।
आम्ही काय खुश झालो म्हणून सांगू .पोळ्या करण्यासाठी काहीही नसल्यामुळे इतक्या दिवस गव्हाचं पीठ आणलं नव्हत .तर त्यादिवशी दिवसभर चपात्या आणि नंतर पराठे (मेथीचे तरी ) बनवण्याचा बेत करत होतो .लगेच दुसर्या दिवशी दुकानातून गव्हाचं पीठ घेऊन आलो .आणि उत्सहाने पोळ्या बनवायला घेतल्या .चपाती मेकर कसा वापरायचा ते अलकाने सांगितल होतच.तरी पण जरा शंका आणि उत्सुकता होतीच की चपात्या कशा बनतील त्याची .त्यामुळे सुरुवातीला अगदी छोटा उंडा म्हणजे औषधाच्या गोळी एवढा घेतला आणि चपाती बनवून पाहिली .पहिल्याच वेळेस अपेक्षा भंग झाला.कारण ती छोटी चपाती खूप कडक झाली होती .कच्ची वैगरे राहिली की काय म्हणून टेस्ट करायला गेलो तर ती चपाती खाकाऱ्या सारखीच लागली .
पण विचार केला की ठीक आहे अगदी कमी पीठ असल्यामुळे कदाचित इतकी कडक चपाती बनली असावी . त्याच्यापेक्षा थोडा मोठा उंडा घेतला तरी पण तेच.तीपण चपाती खाऊन संपवली .पण असे खाकरे टाइप चपात्या कसा खायच्या भाजीबरोबर .तरी पण मेघना म्हंटली ठीक आहे चालतील आपल्याला अशापण कडक पोळ्या ,तर शेवटी पूर्ण चपातीमेकर भरून चपाती होईल एवढा गोळा घेऊन बनवायला सुरुवात केली .सुरुवातीला तो गोळा चपातीमेकरच्या बाहेर यायचा पुन्हा तो आत ठेवायला लागायचा .आणि नंतर २-३ वेळा असं झालं की कुठे चपातीसारखा आकार बनायचा.चपाती बनवत असताना बाजूने वाफ बाहेर पडायची ती इतका भयंकर आवाज म्हणजे कुकरची शिट्टी आणि मिक्सर चा आवाज याचं मिश्रण च होतं.ते पण रात्री साडेअकरा वाजता आम्ही चपात्या बनवत होतो .काय विचार करत असतील आमचे शेजारी माहित नाही . हे झालं आकाराबद्दल पण शेवटी चपाती म्हणून जो final product बाहेर पडत होता तो खूपच दिव्य होता .
अशाप्रकारे नेहमीच्या जेवढ्या पिठामध्ये चार पोळ्या बनतात तेवढ्याच पिठाच्या लहान लहान सहा पोळ्या बनवून घेतल्या.आणि खरी गम्मत तर आता पुढे जेवतांना होती .जो पदार्थ आम्ही चपाती म्हणून खात होतो तो धड चपाती तर सोडाच पण खाकरा पण बनला नव्हता .लहान असतांना जी पहिली पोळी बनवली होती तीसुद्धा यापेक्षा शतपटीने चांगली झाली होती .





जेवणासाठी जेवढा जास्तीत जास्त वेळ बसू शकतो तेवढ्या वेळेत दोघींची मिळून एकसुद्धा चपाती संपली नव्हती .दोन तीन दिवसांच्या शिळ्या पोळ्या सुद्धा त्यापेक्षा चांगल्या लागल्या असत्या कमीतकमी सहज खाऊ तरी शकलो असतो .नेहमी चपातीबरोबर मेथीची भाजी खातो आज मेथीच्या भाजीबरोबर चपाती असंसुद्धा नाही नुसतीच भाजी खात होतो , भुकेल्याला भाजीचा आधार असी आमची गत झाली होती...